PM Kisan 22nd Installment | राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेतीची कामं असोत किंवा घरची ओढाताण, पैशांची नड नेहमीच भासते. अशातच आता राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या पदरात मदतीचं दान पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी ज्या हप्त्याची वाट पाहत होते, तो आता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत.
फेब्रुवारी महिना ठरणार खास
राज्य सरकारने सुरू केलेली ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आता शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. वर्षाला ६ हजार रुपये देणाऱ्या या योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होऊ शकतो. विशेष म्हणजे, केंद्र सरकारची ‘पीएम किसान’ योजना आणि राज्याची ‘नमो शेतकरी’ योजना या दोन्हीचे हप्ते एकापाठोपाठ एक मिळण्याची शक्यता आहे. जर असे झाले, तर शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी मोठी रक्कम जमा होईल, ज्यामुळे रब्बी हंगामातील कामांना मोठा हातभार लागणार आहे.
निवडणुकीपूर्वीच आनंदाची बातमी?
येत्या ५ फेब्रुवारीला राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करून त्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. साधारणपणे दर चार महिन्यांनी हे पैसे जमा होतात. नोव्हेंबरमध्ये मागील हप्ता मिळाला होता, त्यामुळे हिशोबानुसार फेब्रुवारीत पुढचे पैसे मिळणं अपेक्षित आहे.
अशी असेल हप्त्याची गणितं
राज्यात सध्या ९० ते ९४ लाख शेतकरी या योजनांचा लाभ घेत आहेत. केंद्राचा २२ वा हप्ता जमा झाला की, त्यानंतर साधारण आठवडाभराच्या आत राज्य सरकार आपला हप्ता वितरित करते. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ‘पैसे जमा’ झाल्याचा मेसेज खणखणण्याची दाट शक्यता आहे.
बळीराजा रात्रंदिवस शेतात घाम गाळून जगाचा पोशिंदा बनतो, पण अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे तो आर्थिक संकटात सापडतो. अशा वेळी सरकारकडून मिळणारी ही छोटीशी मदत सुद्धा त्याच्यासाठी लाखमोलाची ठरते. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, तर आपले ई-केवायसी (e-KYC) आणि बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करून घ्या, जेणेकरून या ‘डबल धमाक्या’चा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.