Ladki Bahin Yojana KYC: राज्यात लाडकी बहीण योजनेवर अवलंबून असलेल्या लाखो महिलांसाठी सध्या चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. दर महिन्याला खात्यात जमा होणारे १५०० रुपये अचानक थांबल्याने अनेक घरांमध्ये गोंधळ उडाला असून, आपले पैसे गेले कुठे? असा सवाल महिलांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे तब्बल २४ लाख लाडक्या बहिणींचे लाभ बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या सगळ्याला ई-केवायसी करताना दिलेल्या एका चुकीच्या उत्तरामुळे हा घोळ झाल्याचं स्पष्ट होत आहे. Ladki Bahin Yojana KYC
महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना अनेक गरीब, कष्टकरी आणि ग्रामीण महिलांसाठी आधार बनली होती. घरखर्च, औषधपाणी, मुलांचं शिक्षण किंवा रोजच्या गरजांसाठी महिन्याचे १५०० रुपये महत्त्वाचे होते. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यभरातून “पैसे जमा झाले नाहीत” अशा तक्रारी वाढू लागल्या. यामुळे अनेक ठिकाणी महिलांनी संताप व्यक्त केला असून, काही भागात अंगणवाडी, पंचायत कार्यालय आणि तहसील कार्यालयात चौकशीसाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ई-केवायसी करताना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे. फॉर्ममध्ये “तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न समजून न घेता किंवा घाईत भरताना अनेक महिलांनी ‘नाही’ ऐवजी ‘हो’ या पर्यायावर टिक केल्याचे समोर आले आहे. या एका टिकमुळे सिस्टिमने त्या कुटुंबात सरकारी कर्मचारी असल्याचे गृहीत धरले आणि योजनेच्या निकषांनुसार अशा महिलांचे लाभ थेट बंद करण्यात आले.
महिला आणि बालविकास विभागाच्या आकडेवारीनुसार, तब्बल २४ लाख महिलांनी ई-केवायसीमध्ये कुटुंबात सरकारी नोकरदार असल्याचे नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रात सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांची संख्या साधारण ८ ते ९ लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे आकडेवारीत मोठी तफावत दिसून आली असून, याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात लाभ बंद झाल्याचं स्पष्ट होत आहे.
हप्ता थांबल्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. “आम्ही चुकीचा पर्याय निवडला, पण शिक्षा आम्हालाच का?” असा सवाल अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. काही महिलांनी तर सांगितलं की, घरात कोणी सरकारी नोकरीत नसतानाही फक्त एका चुकीच्या टिकमुळे महिन्याचा आधारच गेला आहे.
या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थी महिलांची घरोघरी भेट घेऊन कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. आधार, रेशन कार्ड, कुटुंबाची माहिती याची पडताळणी करून चुकीच्या नोंदी दुरुस्त केल्या जाणार असल्याचं महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात येत आहे.
एकूणच पाहता, ई-केवायसी करताना केलेली एक छोटीशी चूक लाखो महिलांसाठी मोठा आर्थिक अडथळा ठरली आहे. त्यामुळे ज्यांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला आहे, त्यांनी घाबरून न जाता आपली ई-केवायसी माहिती तपासून घ्यावी आणि अंगणवाडी सेविका किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात येत आहे. कारण ही योजना पुन्हा सुरळीत सुरू होणार की नाही, हे आता या पडताळणीवरच अवलंबून आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे का ? हे काम करा 5 मिनिटात तुमच्या खात्यावर 1500 होणार जमा